अंध दाम्पत्य

नाशिकच्या काठे गल्ली भागातील लिफ्ट
नसलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर 
संदेश आणि अंजली नारायणे हे दांपत्य राहतं. दोघंही अंध.
अंजली गुजराथी घरातली, तर संदेश मराठी. अहमदाबादमध्ये
फिजिओथेरपीचं शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली.
पुढं 2001 मध्ये तिचं रूपांतर विवाहात झालं. दोघं नाशकात
फिजिओथेरपीचा व्यवसाय चालवू लागले; पण त्यात चरितार्थ
भागेना, मग वेगवेगळ्या परीक्षा देत राहिले. त्यातूनच
बडोदा बॅंकेत आधी अंजलीला आणि पुढं
संदेशला नोकरी मिळाली.
जगण्याची लढाई अन् निसर्गाचं चक्र एकाच वेळी पुढं जात होतं.
ज्या निसर्गानं अंधत्व दिलं, त्यानंच मातृत्वही दिलं.
गर्भवती असताना सर्वसामान्य स्त्रीप्रमाणंच
पोटातल्या बाळाच्या हालचाली जाणवायच्या.
मातृत्वाची सुखद जाणीव व्हायची. यथावकाश
एका बाळाला जन्म दिला. डॉक्टारांना विचारलं, "बाळ
सगळीकडं पाहतंय ना..? त्याला नीट दिसतंय ना..?' तो सगळं
टकमक पाहात असल्याचं डॉक्टमरांनी सांगितल्यावर
आनंदाला पारावार उरला नाही; पण मातृत्व लाभल्याचं सुख
अनुभवतानाच आता या बाळाला वाढवायचं कसं? या चिंतेचं
काहूरही मनात उठलं... संदेशची आई- सासूबाई-मदतीसाठी धावून
आल्या.
बाळंतपणानंतर महिनाभरानं त्याही परत गेल्या. त्या घरातून
गेल्या अन् झोळीत झोपलेलं बाळ थोड्या वेळानं उठलं. झोळीतून
त्याला काढताना पलंगाची दांडी त्याला लागली. त्यानं
हंबरडा फोडला. दोघांनाही दिसत नसल्यानं बाळाला काय
झालं, हे समजण्याचा प्रश्नाच नव्हता. मन सैरभैर झालं...डोळ्यापु
ढंचा अंधार दसपटीनं वाढल्यासारखं वाटू
लागलं...बाळाला छातीला लावलं अन् आतल्या खोलीत जाऊन
ढसढसा रडले.
काही वेळानं भानावर आले. बाळाच्या आयुष्यात उजेड
पेरण्यासाठी मला अंधाराला कवटाळून चालणार नव्हतं.
मनाशी निर्धार केला...हे रडणं शेवटचंच!
असहाय्यतेच्या अशा अश्रूंना इथून पुढं शत्रू मानायचं...
त्यांना जवळ फिरकूही द्यायचं नाही. त्यासाठी "मला खंबीर
बनव', अशी ईश्वराला प्रार्थनाही केली. त्या क्षणापासून
आजपर्यंत जवळपास दहा वर्षं झाली... त्यांनी मागं वळून पाहिलं
नाही...
"बाळाचं नाव नचिकेत ठेवलं. एके दिवशी बाळाला आंघोळ घालू
लागले; पण मी ओतत असलेलं पाणी त्याच्या नाका-तोंडात जात
होतं. बाळाचा आवाज येईना, तेव्हा मला याची जाणीव
झाली. त्याला पालथं करून पाणी काढलं...
या आणि अशा प्रसंगातून त्याला सांभाळण्याची एक पद्धत
ठरवून घेतली.
बाळानं शी-शू केल्यावर
त्याची स्वच्छता करता यावी, म्हणून त्याला लंगोट
बांधलेला असायचा. शू केल्याचा वास येताच
आम्ही त्याचा लंगोट बदलायचो. शीसाठी एक वेळ मी ठरवून
घेतली होती. त्या वेळेत त्याला मी संडासमध्ये न्यायची.
शीचा वास येताच लंगोट काढून त्याला स्वच्छ
करायची आणि दुसरा लंगोट बांधायची.
कपड्यांच्या रंगांचा विषयच नव्हता. त्यामुळं शर्ट-
पॅंटची वेगवेगळी बटनं मी स्पर्शानं ध्यानात ठेवायची. अंदाजानं
साऱ्या गोष्टी करत असे."
"त्याच्यासाठी स्वतःच पेज तयार केली. घाटा बनवला.
फळांचा रस काढला. हातावर केळांचा कुस्करा केला.
बाळाला भरवताना चमचा वापरला नाही. स्वतःचं एक बोटं
बाळाच्या ओठाच्या कडेला ठेवून दुसऱ्या हातानं त्याला भरवत
असे. बाळाच्या गळ्याभोवती कापड बांधायची; जेणेकरून
त्याच्या कानात पेज, रस जाऊ नये. नचिकेत सात-आठ
महिन्यांचा असताना त्याला भरवण्यासाठी चमचा घेतला होता.
तो माझ्या हातून पडला. नचिकेत दुडदुडत गेला आणि त्यानं
माझ्या हातात चमचा आणून दिला. तेव्हा आनंदाश्रूंनी भरलेले
डोळे बाळाची प्रतिमा मनोमन अनुभवत होते...!"
"नचिकेत दीड वर्षाचा असताना खेळता खेळता घराबाहेर गेला.
बराच वेळ झाला तरी तो आला नाही. मला वाटलं गच्चीवर
गेला असेल. मी तिकडं धावले. गच्चीचा प्रत्येक कोपरा,
सगळा कठडा चाचपून पाहिला; पण तो सापडला नाही.
गल्लीतही शोध घेतला. आमची धावाधाव
शेजारच्या काकूंच्या कानावर गेली. अनिकेत त्यांच्या घरात
खेळत होता. त्यांनी त्याला माझ्याकडं दिलं
आणि अक्षरशः माझा जीव भांड्यात पडला. तेव्हापासून
घराचा दरवाजा आम्ही उघडा ठेवत नाही.
अनिकेतच्या पायातील पैंजणाची घुंगरं
मला त्याच्या हालचालींची जाणीव करून द्यायची.
त्याच्या भावना, संवेदना मला घुंगरांच्या आवाजातूनच
कळायच्या."
नचिकेत अडीच वर्षांचा असताना त्याला नाणी-
नोटांची ओळख करून दिल्याचं सांगून त्या म्हणाल्या, ""पुढे
नचिकेत "आई' म्हणू लागला. आमचं बोट धरून चालू लागला.
आता तो साडेनऊ वर्षांचा झालाय..."आनंदनि
केतन'मध्ये
चौथीतशिकतोय...आई-वडील म्हणून त्याचा सांभाळ करतानाच
त्याला संस्कार मिळावे, म्हणून मी आजही त्याच्या कानाजवळ
रामरक्षा म्हणते. तो स्वतः धार्मिक पुस्तकं वाचून दाखवतो.
पोळ्या भाजायला मदत करतो. तांदूळ निवडून देतो.
रोजची भाजी चिरतो, दूध आणतो. बाजारात खरेदीला गेल्यावर
कपड्यांचे रंग, भाजीपाला, दुकानातल्या वस्तू कशा आहेत,
हेही सांगतो.''
"आता नचिकेतला काय करायचं ठरवलं आहे,' "नचिकेत
चांगला नागरिक व्हावा, यासाठीच
आमची यापुढची सारी धडपड राहील...नचिकेतनं मला मातृत्व
दिलंय खरं; पण आता नचिकेतच आमची आई झालाय...!
पूर्वी तो आमच्या बोटाला धरून चालायचा...आता आम्ही दोघं
त्याच्या बोटाला धरून चालतोय..!''

Post a Comment

0 Comments