श्रीदत्तात्रेयांचे शिष्य

*🔱श्रीदत्तात्रेयांचे शिष्य🔱*
*श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. या शिष्यांवर श्रीदत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला आणि त्यामुळे या शिष्यांनी असे विलक्षण कार्य केले की पुराणांना त्यांची दखल घ्यावी लागली.* 

१) *यदुराजा* - ययाती राजाची कथा प्रसिद्ध आहे. त्याला दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि दैत्यांचा राजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा अशा दोन पत्नी होत्या. ययाती हा अतिशय पराक्रमी आणि वैभवसंपन्न असा राजा होता. त्यांनी संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले होते. आपल्या राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेत त्याने अनेक वर्षे राज्य केले. कालांतराने तो वृद्ध झाला. मात्र तरीही त्याची भोगलालसा काहीं कमी होईना, त्याला शुक्राचार्यांनी आशिर्वाद दिला की जर तुला तुझ्या कोणत्याही मुलाने तारुण्य दिले आणि तुझे वार्धक्य स्वीकारले तर तुला पुन्हा सर्व भोग घेता येतील. त्याला देवयानीपासून यद् व तुर्वस्तु असे दोन आणि शमिष्ठेपासून अनू, द्रह्यु आणि पुरु असे तीन एकुण पाच पुत्र झाले होते. त्याने पाचहीं पुत्रांना आपले वार्धक्य स्वीकारण्याबद्दल विचारणा केली. तेव्हा पुरूने त्याचे वार्धक्य स्वीकारून आपले तारुण्य त्याला दिले. त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र यदू याने वार्धक्य स्वीकारायला नकार देताना _जर मी माझे तारुण्य तुम्हाला दिले आणि तुम्ही देवयानीबरोबर भोग भोगलेत तर तुमच्या रूपाने मीच माझ्या आईबरोबर भोग भोगल्याचे पाप मला लागेल_ असे सांगितले. तेव्हा संतापून ययातीने त्याला हाकलून दिले आणि त्याला राज्याचा भागही दिला नाही. भविष्यात राजा बनल्यावर पुरू राजाने आपल्या ज्येष्ठ भावाला, यदूला राज्याचा वाटा दिला. हा यदू राजा अत्यंत नीतिमान आणि श्रीदत्तात्रेयांची असीम भक्त होता. वडिलांनी हाकलून दिल्यानंतर तो श्रीदत्तात्रेयांच्या शोधात भटकत होता. एकदा दक्षिण भारतामध्ये कावेरी नदीच्या परिसरात फिरत असताना त्याला श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये दर्शन दिले. तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला, त्याच्या डोळ्यांमधून अश्रुपात सुरू झाला. त्याने श्रीदत्तात्रेयांच्या चरणी परमज्ञान देण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीदत्तात्रेयांनी त्याला संपूर्ण ज्ञानाचा बोध केला आणि त्याच्यावर पूर्ण कृपा केली. यदुराजाने श्रीदत्तात्रेय यांची शेवटपर्यंत उत्कट भक्ती केली. त्याने धर्माच्या अधीन राहून प्रजेचा पुत्राप्रमाणे सांभाळ करून अत्यंत ऐश्वर्यशाली असे राज्य केले. त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच *यशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.* यदू हा श्रीदत्तात्रेय यांचा लाडका शिष्य होता आणि त्यांनी त्याला सर्व प्रकारचे ज्ञान आणि ऐश्वर्य प्रदान केले.

२) *परशुराम* - ऋषिश्रेष्ठ जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र म्हणजे परशुराम. त्यांना एकूण चार पुत्र होते. परशुराम यांना विष्णूचा अवतार मानलेले आहे. जमदग्नी ऋषि हे अत्यंत कोपिष्ट होते. एकदा त्यांची पत्नी रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिला उशीर झाला म्हणून ते अतिशय रागवले, त्यांनी आश्रमात असलेल्या आपल्या पुत्रांना आपल्या आईचा वध करायला सांगितले. त्यांनी मातृवधाला नकार दिला. थोड्या वेळाने बाहेर असलेला परशुराम आश्रमात आला तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्याला आपल्या मातेचा वध करायची आज्ञा केली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या परशुने आपल्या आईचे मस्तक धडावेगळे केले. ते पाहिल्यावर जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला. त्यांनी परशुरामाला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा त्याने आपल्या _आईला पुन्हा जिवंत करा आणि आपला कोपिष्ट स्वभाव संपवा_ असे वर मागितले. जमदग्नी ऋषींनी रेणुका मातेला जिवंत केले, परशुराम हे बाह्यवृत्तीने ऋषी असले तरी त्यांचा स्वभाव क्षत्रियाला साजेसा असा होता. त्यांना सर्वसामान्यांबद्दल अतिशय कळकळ होती. त्यांनी सर्व विद्या, कला आणि सिद्धी आत्मसात केल्या होत्या. ते शस्त्र आणि युद्ध विद्येतही निपुण होते. ते ही आपल्या पित्याप्रमाणे थोडे रागीट स्वभावाचे होते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे ते गुरू होते. तसेच त्यांचे महाभारत काळात भीष्मांबरोबर युद्ध झाले होते. कर्णाला ब्रह्मास्त्र विद्या त्यांनी शिकवली होती. एके काळी संपूर्ण भारतवर्षामध्ये क्षत्रियांनी सर्वत्र अराजक माजवले होते. सर्व क्षत्रिय भोग विलासामध्ये रममाण झाले होते. कोणीही प्रजेची काळजी घेत नव्हते. सर्वत्र अनाचार आणि अनीती यांना उत आला होता. अशावेळी परशुरामाने प्रतिज्ञा केली आणि एकदा-दोनदा नव्हे तर एकवीस वेळा पृथ्वी पूर्णपणे निःक्षत्रिय करुन टाकली, त्यांच्या या अलौकिक कार्याने सर्वजण भयभीत झाले आणि त्यांना शरण गेले. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर यज्ञ केले आणि सर्वत्र यज्ञसंस्कृती रुजविली. त्यांनी अपार दानधर्म केला. शेवटी सर्व पृथ्वी त्यांनी कश्यपऋषींना दान केली. त्यानंतर त्यांना राहण्यासाठी त्यांनी समुद्राकडे जागेची विनंती केली आणि त्यातून कोकण भूमी निर्माण झाली असे कथानक आहे. याच कोकणामध्ये महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत असताना त्यांनी श्रीदत्तात्रेय यांची उपासना केली. *श्रीदत्तात्रेय यांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली आणि त्यांना ब्रह्मविद्या आणि श्रीविद्येची उपासना सांगितली.* श्रीदत्तात्रेय आणि परशुराम यांचेमधील संवाद *श्री दत्तभार्गव संवाद* म्हणून प्रसिद्ध आहे. *त्रिपुरारहस्य* नावाच्या ग्रंथामध्ये हा संवाद असून श्रीदत्तात्रय यांनी परशुराम यांना चिरंजिवित्व बहाल केले. *आजही परशुरामांचे वास्तव्य श्री दत्तप्रभूबरोबर बद्रिनाथाजवळ बद्रिकाश्रमामध्ये आहे,* अशी श्रद्धा आहे.

३) *आयुराजा* - सोमवंशातील अतिशय प्रसिद्ध असा राजा म्हणजे नहुष हा होता, त्याने अपार पराक्रम गाजविला आणि शेवटी तो इंद्रपदी आरुढ झाला अशी कथा आहे. आयुराजा हे नहुषाचे वडील होते. त्यांची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचरणी आणि सत्त्वशील होती. विवाहानंतर कितीतरी वर्षे लोटली तरी त्यांना संतती नव्हती. यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना त्रषिमुनींनी श्रीदत्तात्रेयांना शरण जा अशी सूचना केली. तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाउन श्रीदत्तात्रेयांचा ते शोध घेऊ लागले. एके ठिकाणी त्यांना एका झऱ्याकाठी श्रीदत्तात्रेय बसलेले दिसले. त्यांच्या मांडीवर एक तरुण स्त्री बसली होती. तिच्याबरोबर त्यांचे मद्यपान सुरू होते आणि ते दोघेही धुंद झाले होते. त्यांच्या बाजूला मांसही शिजवलेले होते. अशा स्थितीत पाहूनही आयुराजाने दत्तप्रभूना विनम्रपणे प्रार्थना केली. तेव्हा हसून दत्तप्रभू म्हणाले, _'अरे, मी तर असा दुराचारी आहे, तुझी कामना मी पूर्ण करू शकणार नाही.'_ तरीही आयुराजा तेथून हालला नाही. तेव्हा श्रीदत्तात्रेय यांनी त्याचा अपमान केला, त्याची अपशब्दांमध्ये संभावना केली आणि त्याला हाकलून दिले. तरीही विचलित न होता, त्याने अंतःकरणपूर्वक श्री दत्तत्रेयांची उपासना सुरू ठेवली. अशी अनेक वर्षे गेली. शेवटी दत्तप्रभू त्याचेवर प्रसन्न होऊन त्याला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा आयुराजाने श्रद्धापूर्वक वर मागितला की, _कर्तव्यदक्ष, पराक्रमी, आध्यात्मिक, उदार, ज्ञानी, अजिंक्य आणि दीर्घायुध असा पुत्र मला द्या._ श्रीदत्तात्रेयांनी त्याला 'तथास्तु' असा आशिर्वाद दिला आणि मग चक्रवर्ती नहुषाचा जन्म झाला.

४) *पुरुरवा* - पुरुरवा राजाचेही गोत्र अत्रि हे होते. कोणत्या तरी शापाने तो जन्मल्यापासून अतिशय कुरुप होता, तो राजपुत्र होता. परंतु त्याचे रूप अतिशय लाजिरवाणे होते. सर्वजण त्याची निर्भत्सना आणि चेष्टा करीत असत. तो युवराज झाला. त्याचे लग्नाचे वय झाले पण त्याला कोणीही मुलगी देईना, एखादा वधुपिता त्याला मुलगी देण्याची तयारी दाखवी, पण प्रत्यक्षात मुलगी त्याचा स्वीकार करीत नसे. आपल्या रूपामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरुरवा अतिशय निराश झाला. शेवटी त्याने ठरविले की आपण तपश्चर्या करायची. ज्या ठिकाणी अत्रि ऋषिनी तपश्चर्या केली तेथेच आपण जायचे या निश्चयाने तो बाहेर पडला. त्याने तेथे जाऊन तपश्चर्या सुरू केली. त्याला भगवान श्रीदत्तात्रेय यांनी दर्शन दिले. ते म्हणाले की, _जीवन म्हणजे मायेचा खेळ आहे. ही योगमायाच आपल्याला जन्माला घालते आणि संसार क्षेत्रामध्ये खेळवते. संसार म्हणजे तिच्याच लिला आहेत._ श्रीदत्तात्रेय यांनी पुरुरवाला ज्ञान आणि मंत्र दीक्षा देऊन अनुग्रह दिला. त्याला त्यांनी श्रीदेवीची उपासना करायला सांगितली. पुरुरव्याने श्रीदत्तात्रेयांची आज्ञा मान्य करून देवी उपासना सुरू केली. त्याच्या प्रखर उपासनेमुळे त्याला सुंदररूप प्राप्त झाले आणि त्याने दीर्घकाळ राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतला आणि शेवटी तो दत्तचरणी मोक्षधामी गेला.

५) *कार्तवीर्य सहस्रार्जुन* : कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव शीलधारा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजा होता त्याला शंभर पुत्र झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधुन च्यवनऋषींनी शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले, महाराणी शीलधारा याज्ञवल्य त्रदृषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली, मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि पुत्रप्राप्तीचे व्रत करायला सांगितले. कृतवीर्य आणि महाराणी शीलाधरा यांनी मन:पूर्वक निष्ठेने ते व्रत केले. तेव्हा भगवान श्रीदत्तात्रेय संतुष्ट झाले. त्यांनी _पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र होईल_ असा आशिर्वाद दिला. हा मुलगा म्हणजे सम्राट कार्तवीर्य सहस्रार्जुन. कृतवीर्याने आपले राज्य त्याला दिले आणि तो अरण्यात निघून गेला. कालांतराने राज्यकारभार करताना धर्मयुक्त राज्य कशा पद्धतीने करावे, राज्याचा विस्तार कसा करावा, राजधर्म आणि प्रजाधर्म यांचे संतुलन कसे राखावे, याबाबत कार्तवीर्य अर्जुन शंकित झाला. तेव्हा त्याने गर्गमुनींना सल्ला विचारला, तेव्हा गर्गमुनींनी त्याला श्रीदत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले, _दत्तप्रभूच्या आशिर्वादाने तुला राज्यधर्माचे तर यथार्थ ज्ञान मिळेतच त्याचबरोबर अनेक सिद्धी, सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त होतील, कारण श्रीदत्तात्रेय म्हणजे विष्णूचाच अवतार आहेत_ असेही गर्नमुनींनी सुचवले, हे ऐकून कार्तवीर्य अर्जुन श्रीदत्तात्रेयांच्या आश्रमामध्ये गेला. कार्तवीर्य अर्जुन अतिशय निश्चयी आणि महत्त्वाकांक्षी होता. संपूर्ण पृथ्वीचे अधिपती व्हायची त्याची इच्छा होती. त्यासाठी वाटेल तेव्हढे परिश्रम करायची त्याची तयारी होती. तो श्रीदत्तात्रेयांचे आश्रमी पोहोचला तेव्हा श्रीदत्तात्रेयांनी त्याला निरुत्साही केले. _मीच पतित आणि वाममार्गाचे आचरण करणारा आहे. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही. तू त्वरित निघून जा_ असे श्रीदत्तात्रेयांनी त्याला सुनविले. पण तरीही दृढ़ निश्चयाने तो तेथेच सेवा करीत राहिला. काही काळाने दत्तप्रभूंनी त्याचे दोन्ही हात क्रोधाद्मीने जाळून नष्ट केले. तरीही कार्तवीर्य अर्जुन त्यांची सेवा करीत तेथेच राहिता. त्याची श्रद्धा तसूभरहीं ढळली नाही. त्याचा हा दृढ सेवाभाव पाहून श्रीदत्तात्रेय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला यथार्थ ज्ञान दिले. धर्माचा उपदेश केला. याचबरोबर सर्व प्रकारचे ऐश्वर्य त्याला बहाल केले. योगज्ञान आणि ब्रह्मज्ञानही त्याला दिले. त्याला एक हजार हात प्रदान केले. म्हणूनच कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन म्हणून पुढे विख्यात झाला. याचबरोबर त्याला अनेक सिद्धी, शस्त्रे, अस्त्र प्राप्त झाली. याद्वारे त्याने मोठा पराक्रम गाजविला आणि तो महासम्राट होऊन सप्तद्विप पृथ्वीचा अधिपती झाला. कार्तवीर्यसहस्रार्जुन हा श्रीदत्तात्रेयांचा अतिशय लाड़का शिष्य होता. त्याने श्रीदत्तात्रेयांची कृपा संपादून अदभुत ऐश्वर्य प्राप्त केले आणि शेकडो वर्षे पृथ्वीवर निरंकुश राज्य उपभोगिले.

६) *अलर्क* : राजा अलर्क हाही श्रीदत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक शिष्य गणला जातो. त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते. राणी मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता. त्याच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता. कालांतराने राजा अलर्क ऐषआरामामध्ये गर्क झाला, खाणे, पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात तो इतका गर्क झाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला. प्रजेकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडे अराजक माजले. त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. आपला बंधू अशा प्रकारे जीवन वाया घालवत आहे. हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटले. यावर काहीतरी उपाय करायचा आणि अलर्काला वठणीवर आणायचे त्याने ठरविले. त्याने काशिराजाशी संपर्क साधला. त्या दोघांनी मिळून अलर्क राजावर स्वारी करायचे असे ठरविले आणि मोठ्या सैन्याची जमवाजमव करून ते अलर्क राजावर चालून गेले. इकडे अलर्क बेसावध होता. सुबाहू आणि काशिराजाने राज्याला वेढा दिल्याने अरुया राज्यातील रसद तुटून गेली आणि प्रजेची उपासमार होऊ लागली. अशा वेळी अलर्काला अतिशय दुख झाले, अत्यंत संकटाच्या वेळी उपयोगी पडावी म्हणून अलर्काची आई राणी मदालसाने त्याला एक अंगठी दिली होती. तपाला जातेवेळी तिने सांगितले होते की जीवनात अगदी कोणताही उपाय उरला नाते असे प्राणांतिक संकट आले की तू ही अंगठी उघडून पाहा. त्यामध्ये एक ताईत आहे, तो तुला संकटामधून बाहेर काढेल. अलर्काला त्या अंगठीची आठवण झाली. त्याने अंगठी उघडून तो ताईत बाहेर काढला. त्यावरील संदेश त्याने वाचला. _सर्व संकटाचे मूळ कारण कामना अहे. दुर्जनांची संगत टाळावी आणि सज्जनांची संगत धरावी. सर्वात मोठी कामना मुक्त होण्याची कामना ही आहे यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय यांना शरण जावे. ते विश्वगुरू आणि सर्व संकट तारक आहेत,_ तो उपदेश वाचून राजा अलर्क श्रीदत्तात्रेयांना शरण गेला. श्रीदत्तात्रेयांनी त्याला दर्शन दिले. त्यांनी त्याला अनुग्रह देऊन संपूर्ण ज्ञान आणि विवेकबुद्धी प्रदान केली. त्यानंतर तो सुबाहूकडे गेला आणि त्याने आपले सर्व राज्य सुबाहूला अर्पण केले, _आपण दोघेही एक आहोत, तेव्हा हे राज्य तूच सांभाळ_ असे त्याने सुबाहूला विनविले, सुबाहूने ओळखले की त्याच्यावर दत्तप्रभूची कृपा झालेली आहे. त्याने अलर्काला सांगितले की _तूच तुझे आणि माझे सर्व राज्य निरपेक्ष बुद्धीने सांभाळ आणि राजधर्माचे पालन करुन प्रजेचा प्रतिपाळ कर,_ या नंतर सुबाहू हिमालयामध्ये निघून गेला. श्रीदत्तात्रेयांच्या उपदेशाप्रमाणे अलर्काने अतिशय योग्य पद्धतीने राज्य केले आणि शेवटपर्यंत तो दत्तभक्तीमध्ये निरंतर रममाण होऊन राहिला.

७) *प्रल्हाद* : भक्त प्रल्हादाची कथा सर्वांना माहीत आहे. हिरण्यकशपू या दैत्यराजाचा हा मुलगा विष्णूचा परम भक्त होता. तो सतत 'नारायण नारायण' असा जप करीत असे. प्रल्हादाला विष्णूचे नाव घेण्यापासून परावृत्त करण्याचा हिरण्यकशपूने फार प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीच परिणाम होईना, उलट त्याचे नारायण प्रेम वाढतच होते. हिरण्यकशपूने त्याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकले, कड्यावरून खाली फेकून दिले, तलावामध्ये पाण्यात बुडविले परंतु प्रत्येक वेळी विष्णूने त्याचे रक्षण केले. शेवटी कुठे आहे तुझा नारायण, या खांबामध्ये आहे का असे म्हणून हिरण्यकशपूने एका खांबावर लाथ मारली तेव्हा त्यातून नृसिंह अवतार प्रकट झाला आणि त्याने हिरण्यकशपूचा अंत केला, विष्णूने नृसिंह अवतारामध्ये प्रल्हादाला दर्शन दिले. त्यानंतर प्रल्हाद दैत्यकुळाचा राजा अनला, त्याने नीतिनियमाने राज्य केले, त्याला विष्णूने दर्शन दिले, पण त्याला ब्रह्मज्ञान झाले नव्हते. त्यासाठी त्याने श्रीदत्तात्रेयांची उपासना केली. श्रीदत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन त्याला यथार्थ उपदेश केला आणि त्याला मुक्तिपदावर अग्रेसर केले,

८) *सांस्कृती* : सांस्कृती हा सुद्धा श्रीदत्तात्रेयांचा शिष्य होता. तो ब्राह्मण असून विद्यादानाचे कार्य करीत असे, त्याने दत्तप्रभूची उपासना केली आणि त्यासाठी मोठी तपश्चर्या आरंभिली. श्रीदत्तात्रेयांनी त्याची अनेक प्रकाराने परीक्षा घेतली. शेवटी सर्व कसोट्यांना उतरल्यावर त्याला दत्तप्रभूनी दर्शन दिले. त्याने दत्तप्रभूना ब्रह्मज्ञान देष्याची प्रार्थना केली. त्यांना विचारले की _अवधूतांची स्थिती, लक्षणे आणि संचारण कसे असते ? तसेच त्याने योगमार्गाचे आणि अष्टांग योगाबाबत अनेक प्रश्न विचारले._ श्रीदत्तात्रेयांनी त्याला जी उत्तरे दिली त्याला *'अवधूतोपनिषद'* आणि *‘जाबालदर्शनोपनिषद'* असे म्हणतात. अवधूतोपनिषदामध्ये अवधूतांची लक्षणे आणि जीवनपद्धती यावर भाष्य केले आहे. जाबालदर्शनोपनिषद म्हणजे अष्टांग शास्त्राचे सार आहे. जीवनमुक्तीसाठी अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. परमहंस पदाचेही वर्णन यामध्ये आले आहे. *सांस्कृतीने श्रीदत्तात्रेयांचे वर्णन चतुर्भुज, भगवान, योगसम्राट, सकल ऐश्वर्य पंडित, महाधिराज, महायोगी असे केले आहे.* 

 श्रीदत्तात्रेयांचे असंख्य शिष्य असून त्यांनी सर्वांवर त्यांच्या पात्रतेनुसार कृपा केली आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रियांपासून अगदी अंत्यजापर्यंत सर्व वर्गाच्या शिष्यांचा समावेश आहे. या प्रत्येक शिष्याचे जीवन म्हणजे एक स्वतंत्र अवतार कथा होईल. प्रत्येक दत्तभक्ताने त्यांच्या प्रमुख शिष्यांची माहिती करून घेतली पाहिजे. कारण *श्रीदत्तात्रेयांना त्यांनी ज्या पद्धतीने आणि निष्ठेने प्रसन्न करून घेतले त्यावरून साधकाला त्याच्या दत्तसाधनेसाठी उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल.* अत्यंत भाग्यवान अशा सर्व श्रीदत्तात्रेयांच्या शिष्यांचे चरणी विनम्र अभिवादन. 

*🙏!! ॐ नमो भगवते श्रीगुरुदत्तात्रेयाय !!🙏*

Post a Comment

0 Comments