श्रीरामांनी कुठे कुठे वास्तव्य केले?

चौदा वर्षांच्या वनवासात श्रीरामांनी कुठे कुठे वास्तव्य केले.?

रामायण व महाभारत हे समस्त हिंदूंसाठी पवित्र धर्मग्रंथ आहेत. काही लोक म्हणतात की ह्या फक्त कथा आहेत आणि हे काल्पनिक कथेवर आधारित ग्रंथ आहेत. पण बहुसंख्य लोकांची ही श्रद्धास्थाने आहेत. आणि आपल्यापैकी जवळजवळ सगळेच ह्यावर मनापासून विश्वास ठेवतो.
काही लोक तर ह्याचे पुरावे शोधून नास्तिकांचे मत बदलण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतात. प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ अनुसंधानकर्ता डॉक्टर राम अवतार ह्यांनी रामायणावर व श्रीराम आणि सीतेच्या आयुष्यातील घटनांचा अभ्यास करून त्या निगडित २०० पेक्षा जास्त जागा शोधून काढल्या आहेत.
श्रीराम व सीता ह्यांना चौदा वर्षांच्या वनवासाला जावे लागले आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण सुद्धा वनवासाला गेले हे तर सर्वांनाच माहिती आहे. ह्या वनवासादरम्यान ह्या तिघांनी कुठल्या ठिकाणी वास्तव्य केले हे आपण आज जाणून घेऊया.

१. शृंगवेरपूर
श्रीरामांना जेव्हा वनवासाची आज्ञा मिळाली तेव्हा संशोधक व वाल्मिकी रामायणानुसार ते सर्वात आधी अयोध्येहून २० किमी लांब असलेल्या तमसा नदीच्या किनारी गेले. त्यानंतर त्यांनी गोमती नदी पार केली आणि प्रयागराज (अलाहाबाद ) पासून २०-२२ किमी असलेल्या शृंगवेरपूरला गेले.
ह्या ठिकाणी निषादराज गुहाचे राज्य होते. ह्याच ठिकाणी श्रीराम गंगानदीच्या किनारी गेले आणि तेथे त्यांनी नाविकाला गंगा नदी पार करून देण्यास सांगितले.

२. सिंगरौर
प्रयागराजपासून उत्तर -पश्चिमेच्या दिशेने ३५-३६ किमी लांब सिंगरौर नावाचे गाव होते. कदाचित हेच गाव श्रुंगवेरपूर असू शकते. रामायणात ह्या गावाचा उल्लेख आला आहे. हे गाव गंगानदीच्या किनाऱ्यावर वसलेले होते. महाभारतात ह्या स्थानाचा उल्लेख “तीर्थस्थळ” ह्या नावाने झाला आहे.

३. कुरई
प्रयागराज जिल्ह्यातच कुरई नावाचे गाव आहे. हे गाव गंगा नदीच्या किनारी सिंगरौर गावाच्या जवळच आहे. गंगा नदीच्या ह्या तटावर कुरई तर पलीकडच्या तटावर सिंगरौर आहे. सिंगरौर गावातून नदी पार केल्यानंतर श्रीराम. सीता व लक्ष्मण ह्याच गावात उतरले होते.
ह्या गावात एक लहानसे देऊळ आहे. असे म्हणतात की गंगा नदी पार केल्यानंतर श्रीराम, सीता व लक्ष्मण थोड्या वेळासाठी आराम करण्यास थांबले होते. त्याच ठिकाणी आज हे देऊळ बांधलेले आहे.

४. चित्रकूटचा घाट
कुरई गावातून पुढे श्रीराम प्रयागला म्हणजे अलाहाबादला गेले. ह्या ठिकाणी गंगा व यमुना ह्या दोन नद्यांचा संगम आहे. हे ठिकाण सर्व हिंदूंसाठी अत्यन्त पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ह्याठिकाणी आल्यानंतर श्रीरामांनी यमुना नदी पार केली आणि ते चित्रकुटला पोहोचले.
ह्याच ठिकाणी भरताने श्रीरामांच्या पादुका घेतल्या व राजा दशरथाच्या पश्चात त्या पादुका सिंहासनावर ठेवून श्रीरामाच्या वतीने राज्यकारभार सांभाळला.

५. अत्री ऋषींचा आश्रम
चित्रकूटच्या जवळच मध्यप्रदेशातील सतना ह्या ठिकाणी अत्रि ऋषींचा आश्रम होता. अत्रि ऋषी चित्रकूटच्या तपोवनात राहत होते.
ह्याठिकाणी श्रीरामांनी काही काळ सीता व लक्ष्मण ह्यांच्यासह वास्तव्य केले. अत्रि ऋषींच्या आश्रमाच्या जवळच राक्षसांचा एक समूह राहत होता. हे राक्षस आश्रमातील लोकांना त्रास देत असत. यज्ञयागात उपद्रव करत असत. श्रीरामांनी ह्या राक्षसांचा वध केला. ह्याचे संपूर्ण वर्णन वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकांडात केले आहे.
‘पहाटेच्या वेळी जेव्हा श्रीराम आश्रमातून जाण्यास निघाले तेव्हा अत्रि ऋषी त्यांना निरोप देताना म्हणाले की,
” हे राघव! ह्या वनांत भयंकर राक्षस आणि सर्प निवास करतात. ते येथील माणसांना अनेक प्रकारे त्रास देतात. ह्याच कारणाने अनेक तपस्वी लोक अकाली मृत्यू पावतात. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांचा विनाश करून ह्या सर्व तपस्व्यांचे रक्षण करावे.”
श्रीरामांनी महर्षींची आज्ञा शिरोधार्थ मानून त्यांना त्या उपद्रवी राक्षस तसेच माणसांचे प्राण घेणाऱ्या सर्पांना नष्ट करण्याचे वचन दिले व त्यांनी आपल्या पत्नी व प्रिय धाकट्या बंधूंसह पुढे प्रस्थान केले.’

६. दंडकारण्य
अत्रि ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्रीरामांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील घनदाट जंगलांत काही काळ आश्रय घेतला. हे वन म्हणजेच दंडकारण्य होय.
ह्याच ठिकाणी श्रीरामांनी वनवासातील बराच काळ व्यतीत केला. चौदा वर्षांपैकी १० वर्षे ते ह्या ठिकाणी वास्तव्यास होते.
अत्री आश्रमातून ते मध्यप्रदेशातील “रामवन ” येथे गेले. हे सतना ह्या ठिकाणी आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगढमधील नर्मदा व महानदी ह्या नद्यांच्या किनारी असलेल्या ऋषींच्या अनेक आश्रमांत श्रीरामांनी भ्रमण केले. ह्या प्रदेशात ते जवळजवळ दहा वर्षे राहिले.
दंडकारण्य क्षेत्र आणि सतनाच्या पुढे असलेल्या सुतीक्ष्ण मुनी व सरभंग मुनींच्या आश्रमात ते गेले. आणि नंतर सतीक्ष्ण आश्रमात ते परत आले. ह्याचे पुरावे देणारी शृंगी आश्रम, राम-लक्ष्मण मंदिर, मांडव्य आश्रम ही व अशी अनेक स्मारके पन्ना, रायपूर, बस्तर आणि जगदलपूर ह्याठिकाणी आजही आहेत.

७. शहडोल (अमरकंटक)
दंडकारण्यातून श्रीराम आधुनिक काळातील जबलपूर किंवा अमरकंटक (शहडोल ) येथे गेले असावेत असा संशोधकांचा कयास आहे.
शहडोलच्या पूर्वेला सरगुजा नावाचा प्रदेश आहे. येथील एका पर्वताचे नाव “रामगढ” असे आहे. ह्याच ठिकाणी ३० फूट उंचावरून एक धबधबा ज्या कुंडात पडतो त्या कुंडाला “सीता कुंड” असे नाव दिले आहे. ह्याच ठिकाणी “वशिष्ठ गुहा” सुद्धा आहे.
हे शहर गोदावरी नदीच्या किनारी वसलेले आहे व येथे सीता व श्रीरामांचे देऊळ आहे जे अत्यंत प्रसिद्ध आहे. हे देऊळ भद्रगिरी पर्वतावर आहे. असे म्हणतात की वनवासादरम्यान काही काळ भद्रगिरी पर्वतावर व्यतीत केला. स्थानिक मान्यतेनुसार दंडकारण्याच्या आकाशातच रावण व जटायूचे युद्ध झाले होते आणि जटायूचे काही अवयव दंडकारण्यात पडले होते.
असे म्हणतात की जगात जटायूचे एकमेव मंदिर ह्याच ठिकाणी आहे. दंडकारण्याचा उल्लेख पुराणांत सुद्धा अनेक ठिकाणी आला आहे. ह्या क्षेत्राच्या उत्पत्तीची कथा अगस्त्य मुनींशी निगडित आहे. अगस्त्य मुनींचा नाशिक मध्ये एक आश्रम होता तसेच दंडकारण्यात सुद्धा एक आश्रम होता.

७. पंचवटी ,नाशिक
दंडकारण्यामध्ये अनेक मुनींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या, सरोवरे, पर्वत, आणि वने पार करून नाशिकात अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले. अगस्त्य ऋषींचा आश्रम नाशिकमधील पंचवटी येथे होता.
श्रीरामांनी लक्ष्मण व सीतेसह ह्या आश्रमात काही काळ व्यतीत केला. अगस्त्य मुनींनी श्रीरामांना त्यांच्या अग्निशाळेत तयार केलेली शस्त्रे भेट दिली. श्रीराम पंचवटीत राहिले आणि त्यांनी गोदावरीच्या तटावर स्नान आणि ध्यान केले . नाशिकात गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान हे पंचवटी म्हणून ओळखले जाते.
वड, पिंपळ, आवळा, बेल आणि अशोक हे ते पाच वृक्ष आहेत. ह्याच ठिकाणी सीता मातेच्या गुहेजवळ पाच प्राचीन वृक्ष आहेत. ह्या वृक्षांना पंचवट म्हटले जाते. असे म्हणतात ही झाडे श्रीराम-सीता व लक्ष्मण ह्यांनी स्वत: येथे लावली. ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते व श्रीराम-लक्ष्मणाने खर व दूषण ह्या राक्षसांशी युद्ध देखील केले होते.
मारिच राक्षसाचा वध पंचवटीच्या जवळच मृगव्याधेश्वर येथे झाला होता. ह्याच ठिकाणी जटायू व श्रीरामांची मैत्री देखील झाली होती. वाल्मिकी रामायणात अरण्यकांडात पंचवटीचे अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे.

८. सीताहरण झाले ते स्थान (सर्वतीर्थ)
नाशिकमध्ये मारीच, खर व दूषण ह्यांच्या वधानंतर रावणाने सीतेचे हरण केले आणि रावणाला विरोध करताना जटायूचाही मृत्यू झाला.
ह्या घटनेचे स्मारक नाशिकपासून ५६ किमी लांब असलेल्या ताकेड गावात “सर्वतीर्थ” नावाच्या ठिकाणी आहे. जटायूचा मृत्यू ह्याच ठिकाणी झाला. हे ठिकाण इगतपुरीमध्ये आहे. ह्या ठिकाणाला “सर्वतीर्थ” असे म्हणतात कारण ह्याच ठिकाणी मरणासन्न अवस्थेत जटायूने सीता मातेविषयी श्रीरामांना सांगितले.
इथेच जटायूच्या मृत्यूनंतर श्रीरामांनी त्याचे अंत्यसंस्कार केले व आपल्या पित्याचे व जटायूचे श्राद्ध -तर्पण केले. ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणरेषा आखली होती असे म्हणतात.

९. पर्णशाला, भद्राचलम
पर्णशाला हे ठिकाण आंध्रप्रदेशातील खम्माम जिल्ह्यातील भद्राचलम येथे स्थित आहे. हे ठिकाण रामालयहून १ तासाच्या अंतरावर आहे. ह्या ठिकाणाला पनसाला किंवा पनशाला असेही म्हणतात.
ह्याच ठिकाणी रावणाने सीतामातेला पुष्पक विमानात बसवले होते म्हणूनच ह्या ठिकाणाला सीतामातेचे हरण स्थळ मानतात. ह्याच प्रदेशात राम सीतेचे प्राचीन देऊळ आहे

१ ०. सीतेचा शोध (तुंगभद्रा व कावेरी नदीचे क्षेत्र)
सीतेच्या शोधाचे प्रथम स्थान म्हणजे जेथे जटायूचा मृत्यू झाला (सर्वतीर्थ) ते होय. त्यानंतर श्रीराम व लक्ष्मणाने तुंगभद्रा व कावेरी नदीच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी सीतेचा शोध घेतला.

११. शबरीचा आश्रम (पम्पा सरोवर)
तुंगभद्रा व कावेरी नदी पार केल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ विविध ठिकाणी गेले. जटायू व कबंधची भेट झाल्यानंतर ते दोघे ऋष्यमूक पर्वतावर गेले. त्या ठिकाणी जाताना ते पम्पा नदीच्याजवळ असलेल्या शबरी ह्या रामभक्त स्त्रीच्या आश्रमात गेले.
हा प्रदेश आज केरळ राज्यात आहे. पम्पा नदी ही केरळ राज्यातील तिसरी मोठी नदी आहे. ह्या नदीला पम्बा असेही दुसरे नाव आहे. पूर्वी तुंगभद्रा नदीलाच पम्पा म्हणत असत. ह्याच नदीवर हंपी हे शहर वसलेले आहे. ह्या ठिकाणी बोरांची अनेक झाडे आहेत.
रामायणात हंपीचा उल्लेख वानरांचे राज्य किष्किंधा राज्याची राजधानी म्हणून आला आहे.

१२. हनुमान भेट –
मलय पर्वत अन चंदनाची वने पार करत श्रीराम व लक्ष्मण ऋष्यमुक पर्वताकडे गेले. ह्या ठिकाणी त्यांची हनुमान व सुग्रीवाशी भेट झाली.
ह्या नदीला पुराणात चक्रतीर्थ मानले आहे. ह्याच पर्वताच्या पायथ्याशी श्रीरामाचे मंदिर आहे. ह्याच्या जवळच्या पर्वताला “मतंग पर्वत” म्हणतात. ह्याच पर्वतावर मतंग ऋषींचा आश्रम होता.
रामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण!
रामायणावर विश्वास नसणाऱ्यांनो…जा श्रीलंकेत…!

१३. कोडीकरई
हनुमान आणि सुग्रीवला भेटल्यानंतर श्रीरामांनी सेना जमवली आणि त्यांनी लंकेकडे प्रस्थान केले. मलय पर्वत, चंदन वन, अनेक नद्या , धबधबे आणि वने पार केल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेने समुद्राकडे प्रस्थान केले.
श्रीरामांनी त्यांच्या सेनेला कोडीकरई येथे एकत्रित केले. तामिळनाडू राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. कोडीकरई हे ठिकाण वेलंकनीच्या दक्षिणेला आहे. ह्या गावाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पाल्क स्ट्रीट आहे.
ह्या ठिकाणी आल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेच्या असे लक्षात आले की ह्या ठिकाणहून समुद्र ओलांडून जाणे शक्य नाही आणि येथे पूल सुद्धा बांधला जाऊ शकत नाही म्हणूनच श्रीराम त्यांच्या सेनेसह रामेश्वरमला गेले.

१४. रामेश्वरम
रामेश्वरमला समुद्र शांत आहे. म्हणूनच येथे पूल बांधणे किंवा इथून समुद्र ओलांडणे सोपे होते.

१५. धनुषकोडी
वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामांनी तीन दिवस शोध घेतल्यानंतर त्यांना रामेश्वरमच्या पुढे समुद्रात असे स्थान सापडले जिथून लंकेला जाणे सोपे होते. त्यांनी नल व नीलच्या मदतीने लंकेपर्यंत पूल बांधला.
छेदुकराई तसेच रामेश्वरांच्या आजूबाजूला ह्या घटनेच्या संदर्भातील अनेक स्मृतिचिन्हे आजही आहेत. येथील नाविक धनुषकोडीहुन लोकांना रामसेतूचे अवशेष आजही दाखवयाला नेतात.
ह्या ठिकाणी समुद्राची खोली नदीइतकीच आहे आणि काही काही ठिकाणी तळ दिसतो.
खरे तर येथे एक पूल बुडाला आहे. १८६० मध्ये हा पूल स्पष्ट दिसला आणि तो हटवण्यासाटी अनेक प्रयत्न केले गेले. इंग्रज लोक ह्या पुलाला ऍडम ब्रिज म्हणत असत म्हणून ह्या ठिकाणी हेच नाव प्रचलित झाले. इंग्रजांनी हा पूल पाडला नाही परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे रेल्वेचा ट्रॅक तयार करण्यासाठी हा पूल पाडण्यात आला.
३० मैल लांब आणि सव्वा मैल रुंद असा हा रामसेतू ५ ते ३० फूट पाण्यात बुडाला आहे. श्रीलंका सरकारला ह्या बुडालेल्या पुलावर भू मार्ग तयार करण्याची इच्छा आहे तर भारत सरकारला नौवहनासाठी सेतुसमुद्रम हा प्रोजेक्ट तयार करायचा आहे.

१६. नुवारा-एलीया पर्वतरांगा
वाल्मिकी रामायणानुसार श्रीलंकेच्या मध्यावर रावणाचा महाल होता. श्रीलंकेतील “नुवारा एलीया” पर्वतापासून ९० किमी लांब बांद्रवेलाजवळ मध्य लंकेतील उंच पर्वतांमध्ये भुयारे तसेच अनेक गुहा आहेत. ह्या ठिकाणी अनेक पुरातात्विक अवशेष सापडतात.
ह्यांचे कार्बन डेटिंगच्या माध्यमातून वय काढलेले आहे. श्रीलंकेच्या नुवारा एलीया पर्वताच्या आजूबाजूला रावण फॉल, रावण गुहा, अशोक वाटिका, बिभीषणाच्या महालाचे अवशेष ह्यांचे संशोधन केल्यास ह्या गोष्टी रामायण काळातल्या असल्याचे सिद्ध झाले आहे. रामायणात ह्या गोष्टींचे जसे वर्णन केले आहे, ही ठिकाणे आजही तशीच असल्याचे दिसून येते.
तसेच रावणाने ज्या ठिकाणी सीतेला कैद करून ठेवले होते ती जागा आज कोब्रा हूड केव्ह म्हणून ओळखली जाते.

तसेच रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाचा केलानिया येथे राज्याभिषेक करण्यात आला. ह्या प्रदेशात बुद्धिस्ट मठांच्या बाहेर बिभीषणाच्या राज्याभिषेकाची भित्तिचित्रे बघायला मिळतात. वाल्मिकी रामायणात केलनी नदीचा उल्लेख येतो आणि बिभीषणाचा महाल ह्याच केलनी नदीच्या तटावर असल्याचे सांगितले जाते.
तसेच दिवूरुंपौला ह्या ठिकाणी सीतेने अग्निपरीक्षा दिली ती जागा आजही श्रीलंकेत अस्तित्वात आहे.
ह्या सगळ्यावरून असेच सिद्ध होते की रामायण ही एक काल्पनिक कथा नसून हे सगळे खरे खुरे घडून गेले आहे. हिंदू लोकांची श्रद्धास्थाने काल्पनिक नसून ह्या धर्माला एक सुवर्ण इतिहास आहे आणि हे सिद्ध करणारे पुरावे आजही ठिकठिकाणी अस्तित्वात आहेत......

Post a Comment

0 Comments